Monday, February 21, 2011

किल्ले सांकशी

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी 


पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले.


भौगोलिक स्थान
सह्याद्रिची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे.या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर दक्षिणेला बाळगंगा नद्यांच्या खोर्यांची विभागणी होते. या बाळगंगा खोर्यांच्या दक्षिणेला सांकशीचा किल्ला आहे.




स्थान

पनवेल पासून २०किलोमिटर अंतरावर असणारा सांकशीचा किल्ला घनदाट अरण्याने वेढलेला आहे. एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग तर एका बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य. पनवेलजवळ इरशाळ , प्रबळगड , माणिकगड , कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आहेत. पण सांकशी हा यापेक्षा खूपच वेगळा आहे. पनवेलहून पेणच्या दिशेने गाडी निघाली की पनवेलहून १७ ते १८ किमीवर बळवली नावाच फाटा लागतो. या गावाच्या फाट्यावर उतरलं की आपली भ्रमंती चालू होते. बळवली हे छोटसं गाव. लाल मातीच्या भिंती , कौलारू घरं , घरासमोर अंगण , अंगणात असणारी विविध रंगांची फुलं हे सर्व पहातपहात गावाच्या शाळेकडची वाट पकडायची. इथून एक वाट किल्ल्याकडे गेलेली दिसते. विशेष म्हणजे गावाच्या आसपास जवळ कुठे किल्ला असेल याचा मागमूसही लागत नाही. किल्ल्याचा पायथा बळवलीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या बाहेरून लालतांबड्या मातीचा एक रस्ता वेडीवाकडी वळणे घेत भेंडेवाडीपर्यंत जातो. वाटेत आजूबाजूला सर्वदूर भाजीपाल्याचे मळे फुललेले दिसतात. पावसाची रिमझिम चालूच असते. सर्व डोंगरांनी एखाद्या नववधूसारखा शालू पांघरल्याचा भास होतो.



इतिहास

पूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला, त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष आढळतात. राणाकंसच्या काळात सांकसई (बौद्रुद्दीन) किल्ल्यावरुन या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत. हे पालेगार एकमेकांवर स्वारी करुन किल्ले ताब्यात घेत. सागर गडच्या पालेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले.


गडावर जाण्याच्या वाटा


या पठारावरुन किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते.

* समोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीरे चलना अशी क्षणक्षणाला आठवण करून देणारी असल्याने कातळातील खोबण्या जरा जपूनच चढाव्या लागतात. उजवीकडे सुंदर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.
* टेकडीच्या पलिकडच्या बाजूला खालच्या पठारावरून येणारी दुसरी वाट दिसते. या वाटेवर अनेक टाकी खोदली आहेत.



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


* दर्गा-

तासा दीडतासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्याचा पायथा आला हे ओळखण्याची खूण म्हणजे बदुद्दीन दर्गा. हा दर्गा म्हणजे जवळपासच्या बारा गावांचं दैवत. हा दर्गा बराच जुना आहे. अलीकडेच या र्दग्याची नवी इमारत बांधली आहे. या र्दग्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जायला ठळकशी वाट आहे. किल्ल्याची चढण बरीच सोपी आहे. त्यामुळे मधल्या पठारावर जायला २० मिनिटं पुरतात. पठार संपूर्ण हिरवंगच्च असल्याने तिथं थांबण्याचा मोह टाळता येत नाही. पण वेळेचं गणित जुळवायला किल्ला लगेच चढायला लागणं उत्तम होते.

* पाण्याची टाकी-

यापैकी एका टाक्यातलं पाणी चक्क पिवळं आहे. थोडं अंतर चढून गेल्यावर कातळात खोदलेली टाकी लागतात. या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.


वैशिष्ट्य

समोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.

No comments:

Post a Comment