Sunday, March 13, 2011

किल्ले पन्हाळा

माहितीचा स्त्रोत : ग्लोबलमराठी   


पन्हाळगड हा कोल्हापुर भागातील महत्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात.

भौगोलिक स्थान:

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.

कसे जाल ?

चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते.ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो.हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .




इतिहास:पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला.हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता.याचे पहिले नाव पन्नग्नालय .अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला २८-११-१६५९ ला घेतला.किल्ला विजापुरांच्या ताब्यात पडला पण राजांनी तो पुन्हा घेतला.२ मार्च १६६० मध्ये किल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला.छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकुन पडले होते. गुप्तहेरांनी शोधुन काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरुन निसटले. पुढे पावनखिंडीत(घोडखिंड) नरवीर बाजी प्रभु देशपांडे यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जौहरच्या सैन्याला आपल्या प्राणांचे बलिदान देउन थोपविले.
१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून किल्ला ताब्यात घेतला.पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला होता. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात.




ऐतिहासिक घटना:


हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती.




गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

* राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय.वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.आज यात नगरपालिका कार्यालय,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी बॉईज होस्टेल आहे.

* सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यास ठेवले होते.शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.

* राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले.हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे.याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.

* अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारेआहेत.यात वरी,नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे.याशिवाय सरकारी कचे-या ,दारुगोळा अणि टाकंसळ होती.

* चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय.इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला.थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत.येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.

* सोमाळे तलाव -गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे.तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे.ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.

* रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी -सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात.त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.

* रेडे महाल-याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुत- ही पागा आहे मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.

* संभाजी मंदिर-त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.

* धर्मकोठी-संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

* अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची ,काळ्या दगडांची वास्तू दिसते.ही वास्तू तीन मजली आहे.सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे ,तर मधला मजला ऐसपेस आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

* महालक्ष्मी मंदिर-राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे.हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे.ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे .राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

* तीन दरवाजा-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा .दरवाज्या वरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे.इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला. बाजीप्रभुंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.


No comments:

Post a Comment